शैक्षणिक

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अभियंता दिन उत्साहात संपन्न

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अभियंता दिन उत्साहात संपन्न
सांगोला : सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अभियंता दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मयूर नलवडे (सहाय्यक कार्यकारी अभियंता, म्हैसाळ कालवा उपविभाग), गोसावी साहेब (सहाय्यक कार्यकारी अभियंता, म्हैसाळ कालवा उपविभाग) उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी भूषविले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष महादेव गायकवाड व सचिव अंकुश गायकवाड यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
        कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर  प्राचार्य यांनी आपल्या प्रस्ताविकेत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. प्राचार्यांनी सांगितले की, सर विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात भरीव योगदान दिले असून म्हैसूर राज्याचे दिवाण म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या कार्याची दखल घेत इंग्रज सरकारकडून “सर” ही पदवी तसेच भारत सरकारकडून सर्वोच्च सन्मान “भारतरत्न” प्रदान करण्यात आला होता. यावेळी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हटले की, विद्यार्थीदशेत तर्कसंगती, नाविन्यता आणि प्रामाणिकपणा आचरणात आणणे आवश्यक आहे.
          संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर तनुजा मोरे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. पुढे मार्गदर्शन करताना उपाध्यक्ष महादेव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा व कष्ट यांचे महत्त्व पटवून देत सांगितले की, “मोठेपणा हा शिक्षण, डिग्री किंवा पैशावर अवलंबून नसून तो परिश्रम, सखोल अभ्यास व प्रामाणिक आचरण यातून सिद्ध होतो.” त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करूनच पुढे गेले पाहिजे. अभ्यास करताना परिपूर्ण माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. जे काही कराल ते मनापासून आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे असा सल्ला दिला.
         आपल्या भाषणात नलवडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “आधी स्वतःला विकसित करा, तरच तुमचे घर, तुमचे कुटुंब, तुमचे गाव आणि तुमचा देश विकसित होईल आणि तुमची प्रगती होईल.” आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नियोजन आणि त्याची योग्य अंमलबजावणी किती महत्त्वाची आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. आपण जे काही टार्गेट ठेवले आहे, ते मिळवण्यासाठी हे दोन्ही घटक आवश्यक आहेत, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा, तरच आयुष्यात यश मिळेल.” त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात योग्य दिशा मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले.
       गोसावी साहेब यांनी विद्यार्थ्यांना एक अभियंता म्हणून त्यांची समाजाप्रती असलेली जबाबदारी समजावून सांगितली. त्यांनी जलसंपदा विभागातील विविध पदांविषयी माहिती दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी योग्य दिशा निवडता येईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या न्यूनगंडावर बोलताना, त्यांनी हा न्यूनगंड दूर करण्याचा सल्ला दिला आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यास प्रोत्साहित केले. सोशल मीडियाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, “सोशल मीडियाचा योग्य वापर करा, गैरमार्गाकडे जाणे टाळा. आपल्या आयुष्यात स्पष्ट ध्येय ठेवून सातत्याने काम केले पाहिजे.” यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्याचे महत्त्व पटवून दिले आणि सांगितले की, “कॉलेज जीवनात उपलब्ध असलेल्या जास्तीत जास्त साधनसंपत्तीचा योग्य वापर करून आपले सर्वोत्तम द्यावे. त्यातूनच खऱ्या अर्थाने प्रगती साधता येते.”
         आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबुराव गायकवाड म्हणाले की, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झाली. त्यांनी पुढे सांगितले की, दादांनी मराठी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले केले. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि त्याचा मोठा फायदा झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.एस.डी.बावचे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!