राजकीय

रस्ते-पाणी-वीज ते रोजगारापर्यंत ठोस आराखडा; चोपडी गटात चेतनसिंह सावंत यांची विकासाची हमी

महायुतीची ताकद, जनतेचा विश्वास; चोपडी जिल्हा परिषद गटात चेतनसिंह केदार सावंत यांचा निर्धार

रस्ते-पाणी-वीज ते रोजगारापर्यंत ठोस आराखडा; चोपडी गटात चेतनसिंह सावंत यांची विकासाची हमी

महायुतीची ताकद, जनतेचा विश्वास; चोपडी जिल्हा परिषद गटात चेतनसिंह केदार सावंत यांचा निर्धार

सांगोला (प्रतिनिधी): भाजप–शिवसेना–आरपीआय महायुतीकडून चोपडी जिल्हा परिषद गटात चेतनसिंह केदार सावंत हे निवडणूक रिंगणात उतरले असून, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण ते रोजगार या सर्व मूलभूत प्रश्नांवर ठोस आणि कृतीशील विकास आराखडा त्यांनी जनतेसमोर मांडला आहे. विकासाच्या नावाखाली केवळ घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. चोपडी गटातील “प्रत्येक गावाचा विकास, प्रत्येक नागरिकाला न्याय” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण काम करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

कारंडेवाडी (बुद्धेहाळ), कारंडेवाडी ( उदनवाडी), सोमेवाडी, निजामपूर, हणमंतगाव, लोणविरे, नाझरे गावांमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या, चोपडी गटातील विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले. चोपडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांना पक्के रस्ते, नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा आणि अखंड वीज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून प्रभावी पाठपुरावा करण्यात येणार आहे. रखडलेली विकासकामे मार्गी लावून नवीन कामांना गती देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि अंगणवाड्यांच्या सुविधा अद्ययावत केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी शाळा दुरुस्ती, मूलभूत सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न केले जातील. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगार निर्मिती आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.


बेरोजगार युवकांसाठी कौशल्य विकास, प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजना व अन्य घरकुल योजनांच्या माध्यमातून प्रत्येक पात्र कुटुंबाला पक्के घर मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सावंत यांनी सांगितले. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने विकास निधी आणि योजनांचा थेट लाभ चोपडी जिल्हा परिषद गटातील नागरिकांना मिळणार असल्याचा विश्वास महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केला. “मी फक्त निवडणुकीपुरता नेता नाही, तर पाच वर्षे जनतेचा सेवक म्हणून काम करणारा प्रतिनिधी असेन. सर्वसामान्यांचा आवाज जिल्हा परिषदेत ठामपणे मांडेन,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महायुतीची ताकद आणि जनतेचा वाढता विश्वास लक्षात घेता, चोपडी जिल्हा परिषद गटात चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!