उन्हाळ्यात माठाचा आधार: शहरातील बाजारात माठांना मागणी वाढली
गरिबांचा फ्रीज बाजारात, कमी किंमतीमध्ये थंडगार पाणी अन् चवही न्यारी

उन्हाळ्यात माठाचा आधार: शहरातील बाजारात माठांना मागणी वाढली
गरिबांचा फ्रीज बाजारात, कमी किंमतीमध्ये थंडगार पाणी अन् चवही न्यारी
सांगोला (प्रतिनिधी): उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. सालाबादप्रमाणे ‘गरिबांचा फ्रिज’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या माठाचे बाजारात आगमन झाले आहे. मात्र, माठासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने यंदा माठाच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेने वाढल्या आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने नागरिकांना उकाड्याची जाणीव होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध बाजारपेठांमध्ये मातीचे माठ विक्रीसाठी दाखल झाले असून नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
उन्हाचे चटके लागताच थंड पेयांसोबत माठांना मागणी वाढली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचे चटका वाढू लागला आहे. तापमानाने ३७ अंश सेल्सिअस पार केल्याने जीवाची लाही लाही होत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सूर्यनारायणाने आग ओकण्यास सुरुवात केल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे गारेगार थंड पाणी पिण्यासाठी माठाला मागणी वाढली आहे. सांगोला येथील रविवारच्या आठवडा बाजारात माठ विक्री करणारे तसेच कुंभारवाड्यात माठ खरेदीसाठी गर्दी पहायला मिळत आहे. उन्हाळ्यात लागणारी तहान भागविण्यासाठी माठातील पाणी सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळेच उन्हाळ्याची चाहूल लागताच माठ विक्रीसाठी बाजारात सज्ज झाले आहेत.
मातीपासून बनवलेले सर्वांचे लक्ष वेधून घेणारे माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. लाल रंगाच्या मातीपासून लाल माठ बनविण्यात येतात. यातील पाणी थंडच आणि आरोग्यासाठी चांगले असते. मोठा माठाचा दर ४०० रुपयांपासून ते ५०० रुपये, लहान माठाचा २०० ते ३०० रुपयांपर्यंत दर आहेत. त्यापेक्षाही नक्षीदार माठाला मागणी आणि दर अधिक वाढले आहे. हे माठ १००० रुपयांपर्यंत जात आहे. असे विक्रेते सांगतात. माठातील पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आणि चवीला नैसर्गिक थंड असल्याने नागरिकांची फ्रीजऐवजी माठाला पसंती आहे.
मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागल्याने माठ विक्रीला वेग आला आहे. बाजारात साध्या माठांसोबतच नक्षीदार, नळ लावलेले माठ, आणि मातीचे माठ उपलब्ध आहेत.
कच्चा माल (माती) आणि भुसा महागल्यामुळे माठांच्या किमतीत वाढ झाली आहे. उन्हामध्ये वाढ होत असल्याने माठ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कमी किंमतीमध्ये उन्हाळ्यात तहान भागवली जाते म्हणून आज फ्रीजच्या जमान्यातही मातीच्या माठाला वेगळेच महत्व आहे. उन्हाळा जवळ येताच मातीच्या माठाला पुन्हा मागणी वाढते. माठातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते आणि आरोग्यासही फायदेशीर असल्याने अनेक कुटुंबे अजूनही माठातील पाणी पिण्याला प्राधान्य देतात. दरम्यान, प्लास्टिकच्या बाटल्या आणि फ्रिजच्या वापरात वाढ झाली असली तरी माठातील पाण्याची चव आणि नैसर्गिक थंडावा यामुळे मातीच्या माठाला आजही वेगळी ओळख आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरांमध्येही पारंपरिक माठांची मागणी कायम असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
व्यवसाय करणे अवघड माठ खरेदी करताना ग्राहक काहीही भाव करतात. सांगितलेल्या दरापेक्षा निम्म्या दरात माठ खरेदी करण्याची अपेक्षा ठेवतात. त्यामुळे हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने माठ बनवण्यासाठी करावी लागणारी मेहनत व खर्च पाहता आता व्यावसायिक दृष्टिकोनातून माठ बनविणे आज परवडण्यासारखे नाही. यामुळेच माठांचे भाव वाढलेले आहेत. माठ बनविण्याचे साहित्य अत्यंत महाग झाले आहे. त्यामुळे माठ बनविणेही कठीण झाले आहे. मात्र, तरीही आम्ही ग्राहकांना परवडतील असेच दर ठेवलेले आहेत.- नितीन कुंभार, माठ व्यावसायिक, सांगोला



