राजकीय

आमची आघाडी अभेद्यच राहणार; शहाजीबापूंनी आमची चिंता करू नये…!

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी डिवचलं 

आमची आघाडी अभेद्यच राहणार; शहाजीबापूंनी आमची चिंता करू नये…!

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी डिवचलं 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 1(अ) मधून राणी माने आणि प्रभाग 11(अ) मधून सुजाता केदार सावंत यांच्या बिनविरोध निवडी जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या बिनविरोध निवडी सांगोला शहर विकास आघाडीच्या समन्वयातून शक्य झाल्या असून, त्याचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शहाजीबापूंवर आजी-माजी आमदारांनी थेट निशाणा साधला.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, “जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वपक्षीय समन्वय साधण्यासाठी केलेल्या विनंतीला आम्ही, दिपकआबा, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, बाळासाहेब एरंडे आणि इतर सर्वांनी मान दिला. त्यामुळेच बिनविरोध निवड शक्य झाली. ही प्रक्रिया सामूहिक होती; शहाजीबापूंनी स्वतःची पाठ थोपटून या जागांचे श्रेय घेणे हा केविलवाणा प्रयत्न आहे.”

प्रचारात टीका, निकाल जवळ येताच गोडवे!

निवडणुकीपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या एकत्रित येण्याच्या आवाहनाला शहाजीबापूंनी नकार दिला, उलट प्रचारात युतीच्या सर्व मर्यादा सोडून त्यांच्यावर थेट टीका केली. परंतु आज निकाल जवळ येताच तेच शहाजीबापू पालकमंत्र्यांचे गोडवे गाताना दिसत आहेत, अशी टीका आजी-माजी आमदारांनी केली. “वेळेनुसार भूमिका बदलणे हे त्यांचे वैशिष्ट्यच झाले आहे. तालुक्यातील जनतेने हे खेळ अनेक वर्षे पाहिले आहे आणि आता जनता त्याला भुलणारी नाही,” असेही त्यांनी अधोरेखित केले.

‘आमची आघाडी अभेद्य; शहाजीबापूंनी आमची चिंता करू नये’

नागपूर हिवाळी अधिवेशनातून थेट प्रतिक्रिया देताना आमदार देशमुख म्हणाले, “आगामी काळात सांगोला तालुक्यातील निवडणुका आम्ही एकदिलानेच लढवू. आमची आघाडी अभेद्य आहे आणि पुढेही राहील. शहाजीबापूंनी आमची चिंता करू नये. आज ते ज्या निर्णयावरून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत, तोच निर्णय त्यांनी महिनाभर आधी घेतला असता तर ही निवडणूक नागरिकांवर लादावीच लागली नसती.”

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तालुक्याच्या विकासासाठी हात दिला होता, पण शहाजीबापूंनी त्यावेळी व्यक्तिगत स्वार्थ जपला. आज मात्र ‘राजकीय गरज’ म्हणून मैत्रीचे सूर बदलले आहेत.” “निवडणुकीचा निकाल जवळ येत आहे तसे शहाजीबापूंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भूमिका बदलणाऱ्यांना जनता योग्य धडा शिकवेल,” असा ठाम विश्वासही आजी-माजी आमदारांनी व्यक्त केला.

सविस्तर पत्रकार परिषद लवकरच

नागपूर अधिवेशनानंतर सांगोला शहर विकास आघाडीच्या सर्व नेत्यांसह संयुक्त पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घडामोडींवर भूमिका स्पष्ट करण्याची घोषणा आजी-माजी आमदारांनी केली.

शहाजीबापूंना भाजपचे वावडे का?

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले,“मी शेकापचा आमदार आणि दिपकआबा कोणत्याही पक्षात नसतानाही शहराच्या विकासासाठी आम्ही भाजपसोबत जाण्यास तयार झालो. पण महायुतीत असूनही शहाजीबापूंना भाजपचे एवढे वावडे का? भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मारुती बनकर यांना त्यांनी टोकाचा विरोध केला. आम्ही शहराचे हित पहिले; मात्र त्यांनी स्वार्थ पाहिला.”

 

शेकाप–दिपकआबा एकदिलाने; आगामी सर्व निवडणुका एकत्र

“स्व. गणपतराव देशमुख आणि दिपकआबा यांनी सांगोला तालुक्यात विकासाचे राजकारण उभे केले. तीच परंपरा कायम ठेवत शेतकरी कामगार पक्ष आणि दिपकआबा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका एकदिलाने लढवणार आहेत,” अशी घोषणा आजी-माजी आमदारांनी नागपूरहून केली..सांगोला तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत असताना, आजी-माजी आमदारांची ही स्पष्ट भूमिका शहाजीबापूंसाठी थेट आव्हान ठरणारी आहे. आगामी निवडणुकांपर्यंत हा संघर्ष अधिक रंगणार, यात शंका नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!