जवळा गावाच्या विकासासाठी साळुंखे पाटील कुटुंबीय कटिबद्ध – दीपकआबा साळुंखे पाटील
कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवनाचे उद्घाटन उत्साहात

जवळा गावाच्या विकासासाठी साळुंखे पाटील कुटुंबीय कटिबद्ध – दीपकआबा साळुंखे पाटील
कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवनाचे उद्घाटन उत्साहात
सांगोला (तालुका प्रतिनिधी): “राजकारणात जय-पराजय होत असतात; परंतु एखाद्या पराजयाने खचून जाणारे आम्ही नाही. जवळा गाव आणि परिसराच्या विकासासाठी साळुंखे पाटील कुटुंबीय कधीही मागे हटणार नाहीत,” असा ठाम विश्वास माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवन या नव्या वास्तूचे उद्घाटन आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठी जवळा गावाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा शुभारंभ मंगळवारी संपन्न झाला. २५ फेब्रुवारी २०२६ पासून रात्री ७ ते ९ या वेळेत गावातील मोबाईल आणि टीव्ही पूर्णपणे बंद ठेवण्याच्या संकल्पनेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी बोलताना दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत आत्मपरीक्षण करून आम्ही नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. गावच्या विकासासाठी जेवढं काही करता येईल तेवढं निश्चितपणे केले जाईल. आता शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांना सांगोल्याला हेलपाटे मारावे लागणार नाहीत. सर्व विभागीय कार्यालये एकाच छताखाली सुरू होत असून यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल.” एक फूट जागा देण्यासही अनेकदा लोक टाळाटाळ करतात; मात्र साळुंखे पाटील कुटुंबीयांनी प्रमुख चौकातील जागा उपलब्ध करून दिली. ही त्यांची दानत असून सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन विकास साधण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, युवक नेते ॲड. यशराजे साळुंखे पाटील, भाजप नेते संभाजी आलदर, सरपंच सज्जन मागाडे, उपसरपंच नवाज खलिफा, अरुणभाऊ घुले, सुनील साळुंखे पाटील, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय रसाळ यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उमेशचंद्र कुलकर्णी म्हणाले, सायंकाळी मोबाईल व टीव्ही बंद ठेवण्याचा जवळा गावाचा निर्णय सोलापूर जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय आणि नागरिकांमध्ये सामाजिक संवाद वाढेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सज्जन मागाडे यांनी केले.
- अतोनात प्रयत्नांनंतर शासकीय सर्व विभागीय कार्यालये एकाच छताखाली सुरू होत आहेत. यामुळे शासकीय कामांना गती मिळून नागरिकांच्या अडीअडचणी दूर होतील. श्री नारायण मंदिराच्या पावन नगरीत ही सुविधा सुरू होणे हे गावासाठी भाग्याचे आहे. — ॲड. यशराजे दीपकआबा साळुंखे पाटील



