कटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपकआबा गटाच्या जनाबाई चव्हाण यांची निवड

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील कटफळ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाच्या जनाबाई रंगा चव्हाण यांची निवड करण्यात आली.
माजी सरपंच अश्विनी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी दीपक अशोक धांडोरे, मंडाबाई जगन्नाथ शेळके व जनाबाई रंगा चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र धांडोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने मंडाबाई शेळके व जनाबाई चव्हाण यांच्यामध्ये निवडणूक झाली. मतदानामध्ये जनाबाई चव्हाण यांना सहा सदस्यांचा पाठिंबा मिळाला, तर मंडाबाई शेळके यांना पाच सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने सरपंचपदी जनाबाई चव्हाण यांची अधिकृत निवड झाली. निवडणूक प्रमुख मंडळ अधिकारी श्री. जाधव यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पी. ए. बुरुंगले उपस्थित होते
या विजयानंतर गावात ढोल-ताशे, गुलाल उधळत मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला. यावेळी दादासाहेब कोळेकर, देविदास कोळेकर, शहाजी खरात, ॲड. विजय खरात, परमेश्वर हाके, महालिंग भंडारे, मोहन चव्हाण, किरण सावंत, दादा आटपाडकर, महेश दुधाळ, सचिन पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कटफळ ग्रामपंचायतीने जनाबाई चव्हाण यांची सरपंचपदी निवड करून योग्य निर्णय घेतला आहे. गावाच्या विकासासाठी गट-राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. मी स्वतः कायम गावच्या विकासकामासाठी सोबत राहीन. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि शेती विकास यासाठी प्राधान्याने कार्य करावे. – माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सरपंचपदाची जबाबदारी दिली. हा विश्वास सार्थ ठरेल यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करीन. आमचे नेते मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावाचा चौफेर विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. गावातील महिलांचा सक्षमीकरण, तसेच गावात स्वच्छता व पाणीपुरवठा यावर विशेष लक्ष देईन. सर्वांसोबत मिळून गावाचा विकास करणे हेच माझे ध्येय आहे. – नूतन सरपंच जनाबाई चव्हाण