“पुण्यतिथीतून उभा केला माणुसकीचा इतिहास!”
स्व. अंकुश तात्या जरे यांना अनोखी आदरांजली; १५ भूमीहीन कुटुंबांना घरासाठी १५ गुंठे जमीन मोफत

“पुण्यतिथीतून उभा केला माणुसकीचा इतिहास!”
स्व. अंकुश तात्या जरे यांना अनोखी आदरांजली; १५ भूमीहीन कुटुंबांना घरासाठी १५ गुंठे जमीन मोफत
सांगोला (प्रतिनिधी): खवासपूर (ता. सांगोला) येथे सामाजिक बांधिलकीचा हृदयस्पर्शी आणि आदर्शवत प्रत्यय देणारी घटना घडली आहे. स्व. अंकुश तात्या जरे यांच्या प्रथम पुण्यतिथीचे औचित्य साधत त्यांच्या स्मृतींना जपणारी एक अनोखी आणि प्रेरणादायी आदरांजली अर्पण करण्यात आली. १५ भूमीहीन कुटुंबांना घरकुल उभारण्यासाठी तब्बल १५ गुंठे जमीन मोफत देत वसंत आप्पा जरे यांनी माणुसकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित असलेल्या वसंत आप्पा जरे यांनी आपल्या बंधूंच्या स्मरणार्थ घेतलेला हा निर्णय केवळ आदरांजलीपुरता मर्यादित न राहता, अनेक गरजू कुटुंबांच्या आयुष्यात नवसंजीवनी देणारा ठरला आहे. स्वतःची जमीन नसल्यामुळे घरकुल योजनेचा लाभ असूनही घराचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या कुटुंबांसाठी हा उपक्रम वरदान ठरला आहे.
रविवार, दि. १९ एप्रिल रोजी खवासपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, सभापती पुनम इंगवले, युवा नेते ॲड. दिग्विजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून स्व. अंकुश तात्या जरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
राज्य शासनाच्या घरकुल योजनांमुळे अनेकांना घराचे स्वप्न पाहण्याची संधी मिळाली असली, तरी स्वतःची जमीन नसल्याने अनेकांची स्वप्ने अपूर्ण राहतात. हीच सामाजिक गरज ओळखून वसंत आप्पा जरे यांनी १५ गुंठे जमीन संबंधित कुटुंबांच्या नावे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या कुटुंबांना आता स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी वसंत आप्पा जरे यांनी स्पष्ट केले की, “ज्या गरजू कुटुंबांना घरकुल मंजूर झाले आहे, पण जमीन नाही, अशा आणखी कुटुंबांनाही भविष्यात मदत करण्याचा आमचा संकल्प आहे.
“बंधुभावाचा जिवंत आदर्श; राम-लक्ष्मणाची जोडी प्रत्यक्षात!”
आजच्या काळात जमिनीवरून सख्ख्या भावांमध्ये वाद, तंटे पाहायला मिळतात. मात्र, आपल्या भावाच्या स्मृतींना जपत स्वतःची जमीन गोरगरिबांसाठी दान करणारे वसंत आप्पा जरे हे बंधुभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत. “राम-लक्ष्मणाची जोडी आपण ग्रंथांत वाचली; आज स्व. अंकुश तात्या आणि वसंत आप्पांच्या रूपाने ती प्रत्यक्षात पाहायला मिळाली, हे आपले भाग्य आहे,” — दिपकआबा साळुंखे पाटील, माजी आमदार



