महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे १४ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे १४ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित
सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांतील १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार आहे. पावसामुळे सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, आणि मूग या पिकांचे नुकसान झाले आहे, तर भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांनाही फटका बसला आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. १५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात ६ लाख २० हजार ५६६ हेक्टर, वाशीम जिल्ह्यात १,६४,५५७ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ६४ हजार ९३२ हेक्टर, धाराशिव जिल्ह्यात १ लाख ५० हजार ७५३, बुलढाणा जिल्ह्यात ८९ हजार ७८२ हेक्टर, अकोला जिल्ह्यात ४३ जात ८२८ हेक्टर, सोलापूर जिल्ह्यात ५६ हजार हेक्टर, हिंगोली जिल्ह्यात ४० हजार हेक्टर इतके नुकसान झाले आहे.
सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे. नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार बाधित भागातील सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.