
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानंतर पाच नंबर फाट्यासह माण, कोरडा नदीला वाढीव क्षमतेने पाणी
सांगोला (प्रतिनिधी): राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा, नीरा आदी नद्यांना महापूर आला असून मोठ्या प्रमाणात पाणी समुद्राकडे वाहून जात आहे. मात्र, दुसरीकडे दुष्काळी सांगोला तालुक्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने शेतकरी, पशुपालक आणि नागरिक पाणीटंचाईच्या तीव्र संकटाचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पाच नंबर फाट्यासह माण नदी, कोरडा नदी आणि लाभक्षेत्रात वाढीव क्यूसेस क्षमतेने पाणी पोहोचविण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
सांगोला तालुक्यात निम्म्याहून अधिक पावसाळा उलटूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी पिके करपू लागली असून जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तलाव, बंधारे, ओढे आणि इतर जलस्रोत कोरडे पडल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी राज्य शासन आणि संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. राज्यातील महापुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी सांगोला तालुक्याकडे वळविण्याची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली. टेंभू उपसा सिंचन योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना तसेच नीरा उजवा कालव्यातून वाढीव क्षमतेने पाणी सोडून ते पाच नंबर फाटा, माण नदी, कोरडा नदी आणि लाभक्षेत्रातील तलावांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. वाढीव क्यूसेस क्षमतेने पाणी सोडून ते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेल, याबाबत प्रभावी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या निर्णयामुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पाणी उपलब्ध झाल्यानंतर शेतीला आधार मिळण्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गाने आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने दिलेल्या आदेशांचे स्वागत केले आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश; पालकमंत्र्यांचे तातडीचे आदेशदुष्काळी सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला. या प्रयत्नांची दखल घेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाणी सोडण्याचे आदेश दिले. टेंभू, म्हैसाळ आणि नीरा उजवा कालवा योजनांमधून वाढीव क्षमतेने पाणी सोडून ते पाच नंबर फाटा, माण नदी, कोरडा नदी तसेच लाभक्षेत्रातील जलस्रोतांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनांमुळे तालुक्यातील शेतकरी आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



